मुंबई, दि. ९ (पीसीबी) – गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अटी शर्ती घातल्याचे समोर आले आहे. “एखादा परिसर दोन दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली असेल तरच तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येईल”, असा अजब ‘जीआर’ सरकारने काढला आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारवर सर्वच स्तरातून टिका होत आहे.
राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने ७ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. त्यात पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ व दहा किलो गहू मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, या मदतीसाठी अजब निकष लावण्यात आला आहे. ‘अतिवृष्टी वा पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखादे क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास…’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे.