“संकटांशी लढण्याची शिकवण शिवाजी महाराजांकडून मिळालीये”, अक्षय कुमारचा पूरग्रस्तांना संदेश

0
661

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – कोल्हापूर आणि सांगलीत पूर ओसरला असला तरी नव्याने पुन्हा एकदा आपला संसार उभे कऱण्याचे आव्हान पूरग्रस्तांसमोर आहे. पूरग्रस्तांसाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळेच मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. संवेदनशील अभिनेता म्हणून ओळख असणारा तसेच समाजकार्यात नेहमीच पुढे असणारा खिलाडी अक्षय कुमार यानेदेखील सांगली आणि कोल्हापूरकरांसाठी एक खास संदेश पाठवला असून धीर धरा असे आवाहन केले आहे. यावेळी अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत संकटांशी लढण्याची शिकवण त्यांच्याकडून मिळाली असल्याचे म्हटले आहे.

“कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. तुम्ही सर्वांनी धीर धरा असे मी आवाहन करतो. लढणे आणि पुढे जाण्याची शिकवण आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून घेतली आहे”, असे अक्षय कुमारने म्हटले आहे. तसेच सरकार आणि कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ग्रूप तुमची प्रत्येक मदत करण्यासाठी तत्पर आहे. मला विश्वास आहे की तुमचे शहर, जिल्हा, गल्ली, आधीपेक्षा सुंदर आणि चांगले करतील असेही अक्षय कुमारने सांगितले आहे.

मराठी मनोरंजन सृष्टीने केलेली मदत पूरग्रस्त भागांकडे रवाना

दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार मोठ्या प्रमाणात पुढे सरसावले असून मदत पाठवण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि मराठी मनोरंजन सृष्टीकडून पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यातील भागाला शुक्रवारी सकाळी मदत रवाना झाली. आज सकाळी ६ वाजता मुंबईहून मदतीचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक रवाना झाले आहेत तर सकाळी १० वाजता पुण्याहूनही ट्रक पूरग्रस्त भागांकडे रवाना झाले. यासंदर्भातील एक व्हिडिओ अभिनेता सुबोध भावेने ट्विट केला.