श्रीलंकेत उद्रेेक, लोक रस्त्यावर उतरले – खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा तुटवडा, देश कर्जाच्या ओझ्याखाली

0
220

कोलंबो, दि. १ (पीसीबी) – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करतंय. श्रीलंकेतील नागरिकांनी गुरुवारी, 31 मार्चला रात्रभर निदर्शनं केली. पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापटही झाली. राजधानी कोलंबोत पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
कोलंबोमध्ये रात्री 5 हजाराहून अधिक लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला.

राष्ट्राध्यक्षांच्या घरावरच्या दिशेनं जाणाऱ्या आंदोलकांना थांबवताना पोलिसांसोबत झटापटही झाली. या निदर्शनातील 45 जणांना अटक करण्यात आली असून, या दरम्यान एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. या सर्व गोंधळामुळे कर्फ्यू लावण्यात आला होता, मात्र नंतर तो हटवण्यात आला. शहरात पोलीस आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षेंच्या घराच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
श्रीलंका कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. 2.2 कोटी लोकसंख्येचा हा देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्नधान्याचा तुटवडा आणि परिणामी त्यांच्या वाढत्या किंमतींमुळे श्रीलंकेतील नागरिक त्रस्त आहेत. गुरुवारी, 31 मार्चला मध्यरात्री हजारो नागरिकांनी राजपक्षेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या घराच्या दिशेनं मोर्चा काढला. यात अनेक अज्ञात सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट सहभागी होते.
आंदोलकांनी कोलंबोचे मुख्य रस्ते टायरची जाळपोळ करून रोखले. यादरम्यान आंदोलकांनी लष्कराच्या दोन बस आणि एका जीपलाही आग लावली. तसंच, पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.
सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराचे गोळे फेकले, वॉटर कॅननचा वापर केला. सुरक्षारक्षकांनी गोळीबार किंवा रबर बुलेटचा वापर केला की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. AFP वृत्तसेवा संस्थेच्या अधिकृत सूत्रांनुसार, या निदर्शनांदरम्यान राजपक्षे घरात नव्हते. मात्र, या आंदोलनाला हाताळण्यासाठी त्यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
एका खासगी टीव्ही नेटवर्कने या आंदोलनाचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलं होतं. ते प्रक्षेपण तातडीनं रोखण्यात आलं. सरकारच्या दबावामुळेच हे झाल्याचं पत्रकारांचं म्हणणं आहे. तसंच, राजपक्षे कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी पदं सोडण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येतेय. अशी मागणी करणारे काही व्हीडिओ सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत.

निवृत्त बँकर आणि आंदोलनात सहभागी झालेले जगत लियानगे म्हणतात की, “मी या सरकारचं ओझं नाहीय. मी आर्थिकदृष्ट्या ठीकठाक आहे. मात्र, माझा पैसा काहीच कामाचा नाहीय. माझ्याकडे बराच पैसा आहे. मात्र, तो काहीच कामाचा नाहीय. कारण मी त्यानं काहीच खरेदी करू शखत नाही. मी पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी करू शकत नाही. जेव्हा माझ्या घरातील गॅस संपतं, तेव्हा सिलेंडर भरू शकत नाही. माझ्या मते, श्रीलंकेच्या इतिहासातील हा सर्वांत अंधारलेला काळ आहे. आम्ही आमच्याच पैशानं काही करू शकत नाही. आमचे नेते आम्हाला हात न लावताच आमची हत्या करतायेत.”
श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंब सर्वांत ताकदवान मानलं जातं. गोटाभाया राजपक्षेंचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते राष्ट्राध्यक्षही होते. त्यांचे छोटे भाऊ बासिल हे श्रीलंकेचे अर्थमंत्री आहेत. सर्वात मोठे भाऊ चमल हे कृषिमंत्री आहेत आणि त्यांचे भाचे नमल हे देशाचे क्रीडामंत्री आहेत.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था तीन क्षेत्रांवर सर्वाधिक अवलंबून आहे. पर्यटन, चहा आणि कापड उद्योग. कोव्हिडमुळे जगभरात लागलेल्या लॉकडाऊनचा या तिन्ही क्षेत्रांना जबरदस्त फटका बसला. पर्यटन क्षेत्राचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 10 टक्के वाटा आहे. पण पर्यटकांचा ओघ थांबला आणि टुरिझम इंडस्ट्रीला घरघर लागली.
भरीस भर म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध. याची श्रीलंकेला दुहेरी झळ लागली. श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी साधारण 25 टक्के रशिया आणि युक्रेनमधून येतात. हा आकडा रोडवलाय. श्रीलंकन चहाचा सर्वांत मोठा आयातदार रशिया आहे. या संघर्षामुळे ती आयात कमी झालीय.
युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीही वाढतायत. त्यामुळे एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे खर्च वाढले अश्या कात्रीत श्रीलंका सापडलाय. पेट्रोल आणि रॉकेलच्या रागांमध्ये उभं राहिलेल्या 4 लोकांचा मृत्यू झालाय. त्यातले तीन वृद्ध होते. एकाचा मृत्यू तेव्हा झाला जेव्हा रांगेत उभ्या असलेल्या लोकांमधलं भांडण विकोपाला गेलं आणि लोकांनी सुरे काढून मारामारी सुरू केली.
पेट्रोल-डिझेलचा काळा बाजार होऊ नये म्हणून सरकारने पेट्रोल पंपावर लष्कराचे जवान तैनात केलेत. स्वयंपाकाच्या सिलेंडरसाठीही तासनतास रांगा लागतायत.