कोलंबो, दि. २२ (पीसीबी) – श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २९० जणांचा मृत्यू झाला . तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे आज (सोमवार) मध्यरात्रीपासून देशात आणीबाणी लागू कऱण्यात येत आहे, अशी घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी केली.
श्रीलंकेत रविवारी सकाळी पाऊणे नऊ वाजता आठ साखळी स्फोट झाले. पहिला स्फोट कोलंबोच्या सेंट अँथनी चर्चमध्ये झाला. दुसरा स्फोट नेगोम्बोच्या सेंट सबॅस्टियन चर्च आणि तिसरा बट्टिकलोवामधील चर्चमध्ये झाला, तसेच तीन पंचतारांकित हॉटलेलाही लक्ष्य करण्यात आले. यामध्ये शंग्रीला, द सिनामोन ग्रॅण्ड आणि द किंग्जबरी या हॉटेलच समावेश आहे. तर सातवा स्फोट कोलंबोच्या देहीवाला हॉटेलसमोर झाला आणि आठवा स्फोट कोलंबोमध्येच झाला.
दरम्यान, रविवारपासून श्रीलंकेत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भारताकडून मदत म्हणून एअर इंडियाने २४ एप्रिलपर्यंत कोलंबोहून येणारी-जाणारी तिकीटं रद्द किंवा रिशेड्यूल केल्यास त्यावर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवी दिल्लीहून कोलंबोसाठी दररोज दोन विमानांचे उड्डाण होईल तर चेन्नईहून कोलंबोला जाण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे दररोज एक उड्डाण होणार आहे.