श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर; जगभरातून निषेध

0
581

कोलंबो, दि. २२ (पीसीबी) – श्रीलंकेतील पंचतारांकित हॉटेल आणि चर्चवर रविवारी झालेल्या साखळी बाँबस्फोटातील मृतांचा आकडा २९० वर पोहोचला असून त्यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये ब्रिटिश, डच आणि अमेरिकी नागरिकही आहेत. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी नागरिकांमध्ये काही जपानी लोक आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हे हल्ले अत्यंत भयावह असल्याचे म्हटले आहे. ‘श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलांवर झालेले हल्ले अत्यंत भयावह आहेत. या घटनेचा परिणाम भोगावा लागलेल्यांबद्दल माझ्या मनात सहवेदना आहेत,’ असे थेरेसा मे यांनी म्हटले आहे. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हा हल्ला भयानक असल्याचे म्हटले आहे. श्रीलंकेतील नागरिकांना ऑस्ट्रेलिया आपल्या सहवेदना कळवत आहे. आमच्या प्रार्थना आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे, असे मॉरिसन यांनी म्हटले असून, या घटनेनंतर त्यांनी श्रीलंकेला मदतीचे आश्वासन दिले आहे.

नयूझिलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी हा हल्ला धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. न्यूझिलंड सर्व दहशतवादी कारवायांचा निषेध करतो. आमच्या भूमीवर १५ मार्चला झालेल्या हल्ल्यानंतर आमचा निश्चय आणखी दृढ झाला आहे. धर्माचे स्वातंत्र्य, तसेच सुरक्षितपणे प्रार्थनेचा अधिकार यांच्या बाजूने न्यूझिलंड उभा आहे. असा हिंसाचार रोखण्यासाठी आपण एकत्रितपणे उत्तर शोधायला हवे,’ असेही आर्डर्न यांनी म्हटले आहे. ख्रिस्ती नागरिक इस्टर संडे साजरा करत असताना झालेला हा हल्ला दु:खद आहे, असे जेरुसलमेममधील कॅथोलिक चर्चने म्हटले आहे.

पोलिसप्रमुखांनी दिला होता इशारा

‘श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेपूर्वी दहा दिवस आधी पोलिस प्रमुखांनी देशात आत्मघातकी बाँब हल्ल्यांचा इशारा दिला होता,’ अशी माहिती आता समोर आली आहे. पोलिस प्रमुख पुजुत जयसुंदरा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ११ एप्रिलला या धोक्याबद्दलचा गोपनीय इशारा पाठवला होता. ‘परकीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार ‘नॅशनल तोहीत जमात’ (एनटीजे) महत्त्वाचे चर्च; तसेच कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयावर आत्मघातकी बाँबहल्ला करण्याचा कट आखत आहेत,’ असे या इशाऱ्यात म्हटले होते. ‘एनटीजे’ ही श्रीलंकेतील मुस्लिम मुलतत्त्ववादी संघटना आहे.

बाँबस्फोटानंतर श्रीलंकेत संचारबंदी

साखळी बाँबस्फोटांच्या घटनेनंतर श्रीलंका सरकारने देशात रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. स्थानिक वेळेनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजतेपासून ते सोमवारी सकाळी सहा वाजेपरर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. कोलंबोतील सर्व धार्मिक स्थळांभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. चुकीची आणि खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी श्रीलंका सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया बंद करणे ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे श्रीलंकेच्या अध्यक्षांचे सचिव उदय आर. सेनेविरत्ने यांनी सांगितले. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी या घटनेच्या तपासातील प्राथमिक माहिती जाहीर करण्यास नकार दिला. पोलिसच याबद्दल नंतर माहिती देतील, असे त्यांनी सांगितले. या हल्ल्यामुळे श्रीलंकेतील पर्यनटन क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.