शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी शिवसेनेचा १७ जुलै रोजी मोर्चा

0
326

मुंबई, दि, ११ (पीसीबी) – शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांद्रे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालावर १७ जुलै रोजी मोर्चा काढेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेच्यावतीने काढला जाणारा मोर्चा हा पीकविमा कंपन्यांसाठी इशारा मोर्चा असेल. शिवसेनेचा मोर्चा हा शेतकरी मोर्चा नसून, तो शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

इशारा मोर्चानंतरही जर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली निघाली नाहीत, तर शिवसेना शिवसेनेच्या भाषेत विमा कंपन्यांशी बोलेल. शेतकऱ्यांना नडणाऱ्या विमा कंपन्यांना योग्य धडा शिकवू, अशा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. हा विषय फक्त शेतकऱ्यांचा नाही. तर आपल्या अन्नदात्याचा आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे, असे आवाहन करत, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर बँकांची नोटीस लागते. त्याचप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या दारावर लावण्यात यावीत, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी बँकांना केली.