शिवसेनेच्यावतीने पुणे महापालिकेवर ‘जागर मोर्चा’

0
447

पुणे, दि. ९ (पीसीबी) –  पुणे शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर आज (मंगळवारी)  ‘जागर मोर्चा’  काढण्यात आला. या मोर्चाची दखल न घेतल्यास तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला आहे. तसेच पुणे महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही पुणे शहराचे प्रश्न सोडवण्यात हे भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. याप्रसंगी शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क बाळा कदम म्हणाले की, पुणे शहरातील शिवसृष्टी, मेट्रो, नदी सुधार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे  जागर मोर्चा काढावा लागला आहे. या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.