शिवसेना सत्तेत येईल की नाही हे कळेल- उद्धव ठाकरे

0
446

औरंगाबाद, दि. ३ (पीसीबी) – परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची गरज आहे. तसेच १० हजार कोटींची जाहीर झालेली मदतही अत्यंत त्रोटक आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तर जाता जाता परतीचा पाऊस मी पुन्हा येईन म्हणतो, त्याची भीती वाटते, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावत शिवसेना सत्तेत असेल की नाही हे येणाऱ्या दिवसांत कळेलच, असे सुचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.

पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा नसतो, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. अशा या संकटाच्या परिस्थितीत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या मदतीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. पावसाने शेतात पाणी पाणी झालंय. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच नव्हे तर त्यांच्या आयुष्याचा चिखल झालय. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करुया. त्यांना तातडीने केंद्र आणि राज्य सरकारने हेक्टरी २५ रुपये मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. राज्य सरकारने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदतही अत्यंत त्रोटक असल्याचे ते म्हणाले.

पिक विमा कंपन्यांनीही आताच्या घडीला कागदी घोडे नाचवू नये. शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. तसंच बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा देणे थांबवावे अन्यथा विमा कंपन्यांप्रमाणे सर्व बँकांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून यावं. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.