शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी; उध्दव ठाकरेंना दिल्या अयोध्या वारीच्या शुभेच्छा!

0
854

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्देला जाणार असल्याचे जाहीर केले. यावर  मनसेने शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत अयोध्या वारीसाठी शुभेच्छा! परंतु राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असे फलक शिवसेना भवनसमोर लावून सवाल उपस्थित केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळावा कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असून राम मंदिर बांधण्याचे सरकारला आवाहन करणार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम मंदिराबाबत आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत, तेच प्रश्न आता अयोध्येत जाऊन विचारणार आहे, असेही ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेला अयोध्या वारीसाठी शुभेच्छा. पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? असा थेट प्रश्न करून शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? शेती मालाला हमी भाव मिळणार का?
महाराष्ट्रातील दुष्काळ संपणार का? मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?
महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? खिशातील राजीनामे बाहेर पडणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती केली.