मुंबई,दि.२(पीसीबी) – शिवसेना पक्ष नंबर वन राहिला पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. शिवसेना कायम मुंबईत क्रमांक एकचा पक्ष राहिलेला आहे. यावेळी शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे परंतू शिवसेनेखालोखाल राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष झाला पाहिजे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनो मुंबईत आपल्याला राष्ट्रवादीला एवढं मजबूत करायचं की ज्यावेळी मुंबई महानगरापालिकचं जागावाटप होईल त्यावेळी शिवसेनेला आपल्याला बरोबरीच्या जागा मागता येतील, असंही अजित पवार म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेत यावेळी कमीत कमी ५० ते ६० नगरसेवर निवडून आले पाहिजेत, असं काम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून मी महिन्यातला एक संपूर्ण दिवस मुंबईसाठी राखीव ठेवणार आहे, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी २०२२ साली होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.