शिवभोजन थाळी १ कोटी गरिबांपर्यंत

0
311

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच या योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत आहेत. दरम्यान, या योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यास सुरूवात झाली आहे. जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जुन महिन्यात २९ जून पर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यंत्रणेचे कौतुक
या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचं कौतूक केलं आहे.