शिवछत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपमध्ये – नवाब मलिक

0
637

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – शिवछत्रपतींच्या जमिनी विकून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठीच उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या जमिनी विकण्याचा प्रयत्न झाला,  तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही  मलिक यांनी दिला.

नवाब मलिक म्हणाले की,  १९९९ च्या आधी उदयनराजे भाजपचे आमदार आणि मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना हरवले होते. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईच्या मध्यस्थीमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दरवेळी त्यांना तिकीट देत असत. मात्र, राष्ट्रवादीमध्ये असूनही ते कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातली भूमिका घेत असत.

उदयनराजेंना विकास कळत नाही, त्यांच्यात विचार करण्याची ताकद आहे का?  उदयनराजे दिवसा काय करतात ते साताऱ्यातल्या लोकांना माहित आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला.  दरम्यान, मलिक यांच्या आरोपांना उद्यनराजे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.