शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढा कायम; सर्वमान्य उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादीचा पराभव अटळ

0
685

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नाही. डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी देण्याच्या इराद्याने राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्यापासून पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. कोल्हे यांना उमेदवारी दिल्यास पक्षात बंडाळी निश्चित मानली जात असून, कार्यकर्ते मनापासून काम करतील की नाही?, याबाबत पक्ष नेतृत्वालाच खात्री वाटेनासे झाले आहे. विलास लांडे यांना डावलल्यास भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिरूरच्या ग्रामीण भागात विलास लांडे यांच्याबाबत नागरिकांमध्ये फारसे चांगले मत नाही. त्यामुळे दुहेरी कात्रीत सापडलेल्या राष्ट्रवादीला सर्वमान्य होईल, असा उमेदवार देण्याची कसरत करावी लागणार आहे. तसे झाले तरच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित राहतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.