शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ – पंतप्रधान मोदी

0
489

धुळे, दि. १६ (पीसीबी) – शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, त्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राच्या मातीनेही सुपुत्र गमावले. या जवानांच्या कुटुंबीयांना मी नमन करतो आणि त्यांना ज्या आईने जन्म दिला. त्या  सर्वांनाच मी प्रणाम करतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

धुळ्यामध्ये आज (शनिवार) आयोजित एका सभेत मोदी बोलत होते. आपले जवान आहेत म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश उभा आहे, त्यांनी स्वतःला एकटे समजू नये. त्यांचे दुःख मोठे आहे, मात्र सव्वाशे कोटी जनता त्यांच्यासोबत आहे, असा धीर मोदींनी यावेळी दिला.

शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, त्या अश्रूंचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भारत नव्या रितींचा आणि नव्या नीतींचा देश आहे याचा अनुभव आता जगालाही येईल, असाही इशारा मोदी यांनी यावेळी दिला. बंदुक चालवणारे, हल्ला घडवणारे सगळ्यांची झोप उडवू, असे सांगून भारतीय नीती अशी आहे की, आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, कोणी वाटेला गेला, तर मात्र शांत बसत नाही, हे लक्षात ठेवा, असेही मोदींनी पाकिस्तानाला ठणकावून सांगितले.