शहरावर लादेलेले दिवसाआड पाणी पुरवठ्याचे धोरण हटवा

0
276

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत गत २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे. आता धरण १०० टक्के भरलेले असल्याने ते बंधन त्वरीत हटवा आणि रोजचा पाणीपुरवठा सुरू करा अशी मागणी मनसेने केली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना त्याबाबतचे निवेदन आज मनसे शिष्टमंडळाने दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात देखील शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असताना प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात देखील या धोरणात पालिकेकडून शिथिलता दिली जात नाही. आंद्रा व भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे गाजर अजून किती दिवस लोकांना दाखवणार आहात ? नागरिकांची दररोज पाणी देण्याची मागणी वाढत आहे. १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घ्यावा. नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षा करतो. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पाणी देण्यास भाग पाडेल याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.

शिष्टमंडळात गटनेते सचिन चिखले यांच्यासह शहरसचिव रुपेश पटेकर, मनसेच्या शहर महिला अध्यक्ष अश्विनी बांगर , शहर सचिव सिमा बेलापुरकर,उपशहरअध्यक्ष संगीता देशमुख, अनिता पांचाळ, विद्यार्थी सेना शहर संघटक श्रद्धा देशमुख यांचा सहभाग होता.