शहराची लूट कऱण्याचे काम करतात त्यांना बाजुला करा – शरद पवार

0
407

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा बदलण्यासाठी ज्यांनी काम केले त्यांच्याच हातात परत हे शहर सोपवा. जे लोक या शहराची लूट कऱण्याचे काम करतात त्यांना खड्यासारखे बाजुला केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रहाटणी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे तसेच माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजपाशासीत केंद्र सरकारचा विविध मुद्यांवर अत्यंत खरपूस समाचार घेतला. कामगार, शेतकरी विरोधातील सरकारच्या धोरणांवर पवार बरसले. महापालिकेतील भाजपाच्या सत्ताबदलासाठी त्यांनी उपस्थितांनी आवाहान केले. ते म्हणाले, ज्यांनी या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्या हातात परत या शहराची सुत्रे सोपवा आणि जे शहराची लूट कऱण्याचे काम करतात त्यांना खड्यासारखे बाजुला करा.

भाषणात पवार पुढे म्हणाले, मी आता सर्व जिल्ह्याजिल्ह्यात जायचे ठरवले आहे. लोकांचे सुखदुःख जाणून घ्यायचे ठरवले आहे. अनेक वर्षे सत्ता आमच्या हातात होती. त्यावेळी कारखानदारी वाढेल कशी याचाच आम्ही कायम विचार केला. आज काय अवस्था आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये कामगार, कारखानदारीचे जतन कऱण्याची भूमिका होती. आज भाजपा सरकार कामगार हिताचे रक्षण करत नाही. त्यांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही. आमच्या काळात चाकण, रांजनगाव हे महत्वाचे औद्योगिक केंद्र झाले. बारामती, जेजुरी, शिरवळ, इंदापूर अशी विकेंद्रीत कारखानदारी केली. आज चार लाखांवर आयटी मध्ये रोजगार मिळाला, ही धोरणे पूर्वीच्या सरकारने ठरवलेली. आजचे सरकार ते करत नाही. आज भाजपाचे सरकार नवीन कारखानदारीला प्रत्साहन देत नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले. २००४ ला माझ्याकडे शेती खात्याचे काम आले. २०१४ मध्ये मी मंत्रीपद सोडले. काळ्या आईशी ऋण राखले. त्या दिवशी गहू जगाच्या ९८ देशांनी निर्यात करणारा देश झाला. तांदूळ जगात सर्वात जास्त निर्यात कऱणारा देश. जगात २ नंबरची साखर निर्यात कऱणारा देश झाला. फूल, भाजीपाला देश स्वयंपूर्ण झाला. आज फळांचे उत्पादन प्रचंड झाले. याचे महत्वाचे कारण मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरली. भाजपाचे सरकार शेतकऱ्यांबाबत उदास आहे, असे सांगून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा त्यांनी उल्लेख केला.

महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, तुमची ईडी,सीबीआय काय वापरायची ती वापरा, ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार आणि पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेत येणार. दिल्लीच्या सरकारची जबाबदारी राज्यांना मदत करायची असते, आज राज्य सरकारला सापत्न वागून मिळते आहे.