Pimpri

शरद पवार यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या, तर बरं झालं असतं…नितीन राऊत

By PCB Author

June 30, 2020

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. संरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण करु नये, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले होते. त्यावर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “पवारासाहेबांनी सुसंवाद ठेवला असता, तर असं वक्तव्य केलं नसतं, ते स्वतः संरक्षणमंत्री राहिले आहेत, त्या काळात त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या, तर बरं झालं असतं. पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे”, असं म्हणत नितीन राऊतांनी शरद पवारांवर टीका केली आहे .

नितीन राऊत नेमकं काय म्हणाले? “यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते, तेव्हा इंदिराजींनी 1971 चं युद्ध जिंकलं होतं. पण, हे पवारांना आठवलं असतं, तर बरं झालं असतं. पवार हे काँग्रेसमध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे. पण, मग राहुल गांधींबद्दल ते तसं कोणत्या संदर्भात बोलले याबाबत माहिती नाही. खरं तर पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रसार माध्यमांना सामोरं जायचा सल्ला द्यायला हवा होता”, अशी टीका नितीन राऊत यांनी शरद पवारांवर केली

“1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती. देश शस्त्र सज्ज होता, हे पवारांनी विसरायला नको. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ते संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं”, असं नितीन राऊत म्हणाले. “पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पवारांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी चर्चा करायला हवी होती. ते आमचे नेते आहेत. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य का केलं हे माहिती नाही. मला वाटतं त्यांच्या तोंडातून ते शब्द निघून गेले असतील. त्यामुळे निश्चितपणे ते काँग्रेसच्या बाजूने उभे राहतील”, असंही नितीन राऊत म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते? “चीन कुरापत नक्कीच करत आहे. आपण आपला रस्ता आपल्या हद्दीत करत आहोत. आपण आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. सियाचीन भागासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. 1993 मध्ये मी संरक्षण मंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी करार केला”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. “सीमा भागात गस्त घालताना काहीही होऊ शकतं. त्यामुळे लगेच संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणू नये”, असंही पवारांनी म्हटलं. “चीनने यापूर्वीच 1962 मध्ये भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही, हे माहित नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं