मुंबई, दि. २५ (पीसीबी) – लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माथाडी कामगारांनी दोन वेळा मतदान करावे’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे.
या प्रकरणी भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (दि.२४ ) सुनावणी झाली. याप्रकरणी संबंधित यंत्रणेकडे दाद मागावी, अशी न्यायालयाने सुचना करून याचिका मागे घेण्यात यावी, अन्यथा ती फेटाळून लावू, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.
दरम्यान, पवार यांनी दोन वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्यास सांगितले होते. निवडणुकीच्या दोन वेगवेगळ्या तारखा आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.