Maharashtra

“शरद पवार तुम्ही जाणते नव्हे तर विश्वासघातकी राजे”

By PCB Author

December 25, 2020

मुंबई,दि.२५ (पीसीबी) : देशात सध्या शेतकरी आंदोलनाच राजकारण चांगलंच तापलं असून आता विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपाने राज्यभरात संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यादरम्यान कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चा तर्फे आयोजित “किसान आत्मनिर्भर यात्रा” काढण्यात आली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र मधून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

“मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात विरोध करतात, मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, शरद पवारांचं मनावर घेऊ नका. ते नेहमी उलट बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसं लिहून ठेवलं आहे. शरद पवार तुम्ही जास्त खोटं बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.” अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे.