शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन रहावे – सदाभाऊ खोत

0
726

सोलापूर, दि. १४ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानाचा दिवस जसा जवळ येईल, तसे आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण तापू लागले आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथेच रहावे, असे म्हटले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी आयोजित  सोलापुरातील सभेत खोत बोलत होते.

खोत म्हणाले की, शरद पवार येरवड्यामध्ये गेले, तर त्यांनी गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथेच राहावे. तुरुंगात गेल्यानंतर आघाडीच्या काळात आमच्यावर गुन्हे दाखल  करणाऱ्या पवारांना आमचे दुःख काय असते हे कळेल.

शेतकरी संघटनेचे आंदोलन करत असताना आमच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कितीतरी गुन्हे दाखल केले. ते सगळे खोटे गुन्हे होते. एकदा मी येरवड्यात असताना माझ्यावर कराडमध्ये टँकर फोडीचा गुन्हा दाखल केला. आता पवारांनी येरवड्यामध्ये जाऊन रहावे, म्हणजे त्यावेळचे आमचे दुख: त्यांना कळेल, असे खोत म्हणाले.