शरद पवारांच्या अपप्रचाराकडे लक्ष देऊ नका; युतीतूनच आपण लढणार – उध्दव ठाकरे

0
568

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला युती करूनच लढायचे आहे, युतीत वाद सुरु असल्याचा प्रचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभेचे जागावाटप आणि मुख्यमंत्रिपद याबाबत माझे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे सुरु आहे. आपल्याला युती करूनच लढायचे आहे, युतीत वाद सुरु असल्याचा अपप्रचार जर शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला .

दरम्यान, या बैठकीत शेतकरी प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा झाली. तुम्ही पीक विमा योजना, शेतकऱ्यांच्या समस्या, जिल्ह्यातील आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.