Desh

शबरीमला वाद: केरळमध्ये हिंसाचार, ७४५ जणांना अटक, १०० जखमी

By PCB Author

January 04, 2019

केरळ, दि. ४ (पीसीबी) – दोन महिलांनी बुधवारी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने गुरूवारी केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. या बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. शबरीमला कर्म समिती आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने या बंदची हाक दिली होती. गुरूवारच्या हिंसाचारात अनेक सरकारी बसगाड्यांचे नुकसान करण्यात आले. बंददरम्यान वाहनांची आणि दुकानांची मोडतोड करण्यात आली असून काही ठिकाणी माकपच्या कार्यालयांवर आणि पोलीस ठाण्यांवर हल्ले करण्यात आले. या हिंसाचारप्रकरणी केरळमध्ये एकूण ७४५ जणांना अटक करण्यात आली.

दोन ठिकाणी आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. तर काही ठिकाणी माकपच्या कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले. कन्नूर जिल्ह्यात थलासेरी येथे माकप चालवत असलेल्या एका बिडी कारखान्यावर निदर्शकांनी गावठी बॉम्ब फेकला, मात्र त्याचा स्फोट झाला नाही. एर्नाकुलम आणि मलप्पुरम जिल्ह्यांतील माकपच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. या हिंसाचारात ३१ पोलीस जखमी झाले आहेत. या हिंसाचारासाठी भाजपा आणि संघ जबाबदार असून दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले.

या हिंसाचाराप्रकऱणी पोलिसांनी ७४५ जणांना अटक केली आहे. तर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ६२८ जणांना ताब्यात घेण्यात आले. या हिंसाचारात १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. राज्यपाल पी. सदाशिवम यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याकडून अहवाल मागवला आहे. बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी माहिती मागितली आहे. दरम्यान, हा हिंसाचार सुरु असतानाच गुरुवारी श्रीलंकेतून आलेल्या एका महिलेनेही शबरीमला मंदिरात प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले.