शबरीमला मंदिरातील प्रवेशावेळी अनुचित प्रकार घडल्यास आम्ही जबाबदार नाही – तृप्ती देसाई

0
750

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – केरळमधील शबरीमला मंदिरात  प्रवेश करतेवेळी कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडला, तर आमची जबाबदारी नसेल, तर केरळ सरकारची असेल, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्रही लिहिले आहे.

तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात१७ नोव्हेंबरला  प्रवेश करणार आहेत. त्यावेळी आम्हाला सुरक्षा पुरवा, असे तृप्ती देसाई यांनी पत्रात लिहिले आहे. मात्र या पत्राला पी. विजयन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.  दरम्यान, महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न देसाई यांनी केला होता. त्यावरून  मोठे वादंग माजले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबरला शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाचा आम्हाला आदर आहे. आमचे सरकार या विरोधात नाही. भक्तांच्या श्रद्धेबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र तेवढाच आदर आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आहे,  असे पी. विजयन यांनी म्हटले आहे.