शंभर कोल्हे आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत

0
881

नागपूर, दि.१३ (पीसीबी) – राज्याच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आता सर्वच पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात पहिली सभा पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. शंभर कोल्हे जरी एकत्र आले तरी सिंहाची शिकार करू शकणार नाहीत, असे म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांना टोला लगावला.

“माझ्या विरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला, अशा पळपुटांना आमच्या विरोधात का उभे करता?,” असा सवाल फडणवीस यांनी यावेळी केला. “आमच्या विरोधात लढण्यासाठी चांगले पैलवान उभे करा,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. १०० कोल्हे जरी एकत्र आले तरी ते सिंहाची शिकार करू शकणार नाही,” असे म्हणत त्यांनी आशिष देशमुख यांनाही टोला लगावला.