मुंबई, दि. १६ (पीसीबी) – सीमेच्या रक्षणासाठी जीवाची आहुती देणाऱ्या जवानांच्या वीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास देण्यात येतात. आतापर्यंत ६३९ वीरपत्नींना याप्रकारे पास देण्यात आले आहेत. त्यात, सातारा जिल्ह्यातील ९० वीरपत्नींना पास देण्यात आले असून मुंबईत १२ पास सुपूर्द करण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाने सीमेवर प्राणाची आहुती दिलेल्या जवानांच्या पत्नींसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना लागू केली आहे. त्यात एसटीच्या सर्व बसमधून आजीवन मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे. त्यात राज्यातील ६३९ वीरपत्नींचा समावेश आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील ९० वीरपत्नींना पास देण्यात आले आहेत. साताऱ्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये ७८, पुणे ७५, सांगली ७१, सोलापूर ३३ वीरपत्नींना एसटीचा पास देण्यात आला आहे.