मुंबई, दि. १५ (पीसीबी) – क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआय च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज (सोमवार) झालेल्या बैठकीत संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली.
कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर या बैठकीत इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात येऊन लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.
यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याच्याऐवजी दिनेश कार्तिक यालाच निवड समितीने पसंती दिली. तसेच हार्दिक पांड्या याच्या बरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला संधी देण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेऊन लोकेश राहुल याला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघातील १५ खेळाडू असे –
विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव
युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा