नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अर्जुन पुरस्कार समितीने शिफारस केली आहे. कोहली याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब देण्यात आला आहे.
मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
तर २०१७ मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले होते.