Maharashtra

विधानसभेच्या १२ जागा द्या; सदाभाऊ खोतांची भाजपकडे मागणी

By PCB Author

July 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी)  –  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने १२ विधानसभा जागांची मागणी भाजपकडे केली आहे. अनेक ठिकाणी संघटना मजबूत असल्याने ही मागणी रास्त आहे,  असा  दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

बुलडाणा दौ-यावर आलेले खोत पत्रकारांशी बोलत होते.  त्याआधी त्यांनी कृषी विभागाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात  उपस्थित लावली.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी व पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत खोत यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी माळविहीर येथील एका शेताला भेट देऊन  खोत यांनी सोयाबीन पिकाची कोळपणी केली.

भाजपकडून मित्रपक्षांनी किती जागांची मागणी करायची, याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य मित्रपक्षांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये चर्चा करून जागा ठरवण्यात येणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे देण्यात येणार असून, त्यानंतर मित्रपक्षांच्या जागांचा निर्णय होईल, असे खोत यांनी सांगितले.