बीड, दि. २४ (पीसीबी) – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी माझे वैयक्तिक भांडण नाही. लोकांच्या हितासाठी आपला संघर्ष चालू आहे. परळीकरांच्या प्रत्येक अडचणीत मी धाऊन जातो, मग माझ्यात काय कमी आहे?, असा भावनिक सवाल करून ही निवडणूक माझ्यासाठी जीवन मरणाची आहे , असे राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा परळीत दाखल झाली. या यात्रेचे दुचाकी फेरीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत मुंडे बोलत होते. आपल्याला विधानसभेला विजयी केले तर मतदार संघाची ताकद निर्माण करु. परळी मतदार संघाला विचारात घेतल्याशिवाय राज्याचे राजकारण होणार नाही, असे ते म्हणाले.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांचे परळी व अंबाजोगाई हे दोनच तालुके पीक विम्यातून कसे वगळले ? असा सवाल पंकजा मुंडे यांचे नांव न घेता मुंडे यांनी केला. दोन वेळा परळीकरांनी लेकीला आशिर्वाद दिले. तुमच्या सेवेत मी २४ वर्षांपासून असून लेकालाही एकदा आशिर्वाद द्या. परळीकर यावेळी आशिर्वाद देण्यात कमी पडणार नाहीत, असा विश्वास मला आहे , असे ते म्हणाले.