पुणे, दि. १९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी राजीव मिशन, राजीव गांधी स्मारक समिती च्या वतीने पुण्यात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. हजारो नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, या मागणीसाठी स्वाक्षऱ्या केल्या.
टिळक चौकातील न. चि. केळकर व सेनापती बापट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला सुरवात करण्यात आली. काँग्रेसचे नेते आबा बागुल, सदानंद शेट्टी, सोनाली मारणे, राष्ट्रवादीचे रवींद्र अण्णा माळवदकर, प्रवीण करपे, गणेश नलावडे, सूर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, गौरव बोराडे, संजय उकिरडे, विनायक चाचर, संदीप मोरे, सुरेश कांबळे, अनंता गांजवे, शारदा वीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे. निःपक्ष व पक्षपाती मतदानासाठी यापुढे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ईव्हीएमचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला आहे.