महाराष्ट्र,दि.११(पीसीबी)-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, राज्यात सत्तास्थापनेची नवीन समीकरणं उदयास आल्यानंतर भाजपात गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले सहा ते सात आमदारांनी अजित पवारांना फोन करून परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची सत्ता येणार असेल तर राजीनामा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पवारांना सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीआधी सर्वच विरोधी नेते पराभूत मानसिकतेमध्ये होते. पराभवाच्या भितीमुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण आता सत्तेची समीकरणं बदलू लागल्यानंतर पुन्हा परतण्याची तयारी नेत्यांनी केली आहे.