सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय एकाही शिवसेनेच्या आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचमुळे काही सेना आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सेनेचे किमान १५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नाराज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला.
आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त आमदार चिखलीकर पंढरपुरात आले होते. यावेळी विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. माझ्याप्रमाणे शिवसेनेतील किमान २० आमदार पक्षात नाराज आहेत. नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे ४ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ६ आमदार असताना एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. निकटवर्तीयांना मंत्रिपद दिल्याने सेनेच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे चिखलीकर यांनी सांगितले.