विधानसभा निवडणुकीत मनसेसोबत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

0
388

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही. तसेच या निवडणुकांसाठी मुस्लीम समाजाचे २५ उमेदवार देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत. तसेच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टीकोन प्रादेशिकही नाही आणि धार्मिकही नसल्याचे ते म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये काडीमोड झाला होता. त्यानंतर एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यावर बोलताना “एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत. त्यांनीच ते बंद केले. त्याची चावीही एमआयएमकडेच आहेत,”असे आंबेडकर म्हणाले.