Maharashtra

विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जाणार?

By PCB Author

July 09, 2018

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर, आता सत्ताधारी भाजप सत्तेत आल्यानंतर साडेतीन वर्षांनी विधानपरिषदेत सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष झाला आहे. भाजपचे संख्याबळ २१ झाले आहे, तर सत्ताधाऱ्यांचे एकूण संख्याबळ ४० म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त झाले आहे. परिणामी विधानपरिषदेत सत्ताधारी बहुमतात आले आहेत. तर याआधी एक नंबरवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटले असून आता त्यांच्या आमदारांची संख्या काँग्रेसएवढी म्हणजेच १७ झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे असलेले सभागृहाचे सभापती, उपसभापती ही पदे आता त्यांच्या हातातून जाऊ शकतात. विधानपरिषदमध्ये भाजप संख्येने एक नंबरचा पक्ष झाला आहे. यामुळे भाजप, शिवसेना, मित्रपक्ष आणि अपक्ष यांचे संख्याबळ आता विरोधकांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनात सभापती, उपसभापती या पदांवर सत्ताधारी दावा करण्याची शक्यता आहे. तेव्हा पुढील अधिवेशन हे आणखी वादळी ठरणार हे नक्की.