वाशीम जिल्ह्यातील पोलिस हवालदाराची बदली तत्काळ रद्द करा: देवेंद्र फडणवीस पोलिसांनी प्राथमिक सुविधा मागणे गुन्हा आहे का?

0
356

मुंबई, ३० मे (पीसीबी) : पोलिसांना सुविधा मिळत नाहीत, असे गार्‍हाणे मांडणार्‍या वाशीम जिल्ह्यातील पोलिस हवालदार संजय घुले यांना शिक्षा म्हणून केलेली बदली तत्काळ रद्द करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोरोनाशी लढताना आपल्या पोलिस दलातील जवान स्वत:चा जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजवित आहेत. कोरोनाशी लढताना आतापर्यंत राज्यातील सुमारे 2300 हून अधिक पोलिस जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे. आपण मुंबई ते नागपूर असा परतीचा प्रवास करताना 17 मे रोजी वाशीम जिल्ह्यातील जऊळका पोलिस स्थानक, किन्हीराजा पोलिस दलातील हवालदार श्री संजय घुले यांची मार्गात भेट झाली होती. त्यांची विचारपूस केली असता, सॅनेटायझर किंवा मास्क यापैकी कोणत्याही प्राथमिक सुविधा त्यांना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कुणीतरी या घटनेचा व्हीडियो काढून व्हायरल केला. त्यानंतर 28 मे रोजी राज्याचे गृहमंत्री वाशीम जिल्ह्यात येऊन गेले असता, त्याचदिवशी पोलिस अधीक्षकांनी त्यांची किन्हीराजा येथून वाशीम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या धनज येथे बदली केली. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बदलीचे ठिकाण हे सुमारे 140 कि.मी. अंतरावर आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणार्‍या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलिस दलात संतापाची भावना आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात की, पोलिसांना प्राथमिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. मध्यंतरी नागपूर उच्च न्यायालयात एका प्रकरणात नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात नागपूर शहरातील 7000 पोलिसांना 780 मास्क, 5 पीपीई किट, 14 एन 95 मास्क आणि 21 सॅनेटायझर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले होते. एका शहराची ही अवस्था असताना अशाप्रकारच्या काळात अशा शिक्षा देणार्‍या बदल्या केल्या जाणार असतील, तर ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करावी आणि श्री संजय घुले यांना त्यांच्या मुळ जागी पुन्हा काम करण्याची अनुमती द्यावी.

आकडेवारीपेक्षा कोरोनाविरूद्ध उपायांवर अधिक लक्ष हवे!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या आणखी एका पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी काल एकाच दिवशी सर्वाधिक रूग्णांना घरी सोडण्याचा आणि एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यूसंख्या आढळून येण्याकडेही लक्ष वेधले आहे. आकडेवारीपेक्षा कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली आहे. या पत्रात ते म्हणतात की, 4 एप्रिलपासून ते 28 मे 2020 पर्यंतच्या आकडेवारीचे अवलोकन केले असता सरासरी 344 रूग्ण एका दिवशी रूग्णालयातून घरी परतत आहेत. या 54 दिवसांत 18,564 रूग्ण घरी परतले आहेत. मात्र काल दि. 29 मे रोजी एकाच दिवशी 8381 रूग्णांना घरी सोडण्यात आल्याची बाब राज्य सरकारच्या शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. त्यातील 6191 एकट्या मुंबईतील असल्याचे मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे निदर्शनास येते. असाच प्रकार मृत्यूच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याच्या बाबतीत आहे. वरील कालखंडातील आतापर्यंतच्या दिवसांची मृत्यूची सरासरी काढली तर ती 36 च्या आसपास येते. परंतू गेल्या 4 दिवसांपासून मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या शंभरीच्या घरात गेली आहे. 26 मे रोजी 97, 27 मे रोजी 105 आणि 29 मे रोजी तब्बल 116 मृत्यू झाले आहेत. एकिकडे रूग्णांना घरी सोडणार्‍यांच्या संख्येत वाढ आणि दुुसरीकडे मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत सुद्धा वाढ, ही बाब चिंताजनक आहे. योग्य काळजी न घेण्याच्या अनेक घटना निदर्शनास येत आहेत. वांद्रे पोलिस ठाण्यातील हवालदार श्री दीपक हाटे यांना दहा दिवस शासकीय केंद्रात उपचार दिल्यानंतर सुटी देण्यात आली आणि घरी परतल्यावर अवघ्या काही क्षणात त्यांची प्रकृती अवस्थ झाली. रुग्णवाहिका मिळण्यासाठी त्यांनी दोन तास संघर्ष केला. पण, त्यांना कोणतीही रूग्णवाहिका मिळाली नाही आणि परिणामी चार तासातच त्यांचा मृत्यू झाला होता.