वारीत साप सोडण्याविषयीच्या संभाषणावर विश्वास नाही – अजित पवार

0
1008

पुणे, दि. २८ (पीसीबी) – आषाढी वारीत साप सोडण्याचा डाव असल्याची माहिती मिळाल्याचे मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी सांगितले होते. मात्र, असे काही संभाषण मराठा बांधवांनी केले असेल, यावर आपला विश्वास नाही, असे माजी  उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच असे काही संभाषण असल्याचा दावा जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत, तर हे संभाषण सार्वजनिक करावे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. आज (शनिवार) होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला मी आणि धनंजय मुंडे जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. तर या आंदोलनात तिघांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर  आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्ष गटनेत्याची बैठक बोलावली आहे.