मुंबई, दि. १९ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत उपस्थित होते. पण मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना शिवसेनेने मोदींच्या कृतीचे समर्थन केले आहे.
मौन स्फोटक असते. वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद असते, अशी प्रतिक्रिया देत मोदींवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. मोदींना जे काही सांगायचे आहे, ते त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कामतून सांगितले आहे, असे सांगून राऊत यांनी मोदींची पाठराखण केली आहे.
राऊत म्हणाले की, अमित शहांची पत्रकार परिषद होती आणि मोदी त्या पत्रकार परिषदेला पक्ष कार्यकर्ता म्हणून उपस्थित होते. त्यांनी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे. केदारनाथ मंदिराला मोदींनी दिलेल्या भेटीवर राऊत म्हणाले, मंदिरांना भेट देणे ही हिंदू संस्कृती आहे, राजकारण नाही.