“वाघ कसला? हा तर शेळपट माणूस.. हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे महाराष्ट्राचं दुर्दैव”

0
313

मुंबई,दि.२६(पीसीबी) – उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणवतात त्यांनी कधी कुणाला एक कानफटात तरी मारली आहे का? आमच्यासारखे शिवसैनिक होते त्यावेळी म्हणून शिवसेना उभी राहिली. गुन्हे आम्ही अंगावर घेतले या शेळपट माणसाने नाही. वाघ कसला? हा तर शेळपट माणूस.. हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. मोदींच्या जीवावर निवडणूक लढवली म्हणून ५६ आमदार तरी आले पुढच्या वेळी तेवढेपण येणार नाहीत. दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यापुढे माझ्यावर किंवा माझ्या मुलांवर टीका केली किंवा भाजपावर टीका केली तर तशाच भाषेत उत्तर दिलं जाईल. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे म्हणून मी गप्प बसलो आहे. जर मातोश्रीच्या आत काय काय चालतं ते सांगितलं ना तर कपडे घेऊन पळत फिरावं लागेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्यावेळी राणे पितापुत्रांचा उल्लेख बेडुक असा केला होता. बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला असं उल्लेख त्यांनी करत नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार नारायण राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेतला.