वडापाव दिला नाही म्हणून केली जबर मारहाण; नक्की काय आहे प्रकरण…

0
692

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – टपरी बंद करत असताना आलेल्या ग्राहकांनी वडापाव मागितला. मात्र, टपरी बंद करण्याची वेळ झाल्याने टपरी चालकाने वडापाव नसल्याचे सांगितले. त्यावरून एका टोळक्याने टपरी चालकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री पावणे नऊ वाजता गणेशनगर, टेल्को रोड, भोसरी येथे घडली.

प्रशांत लांडगे, ईश्वर राजू पवार (वय 32), शेखर राजू पवार (वय 26), रोहित मुकुंदराव पवार (वय 19, सर्व रा. गणेशनगर, टेल्को रोड, भोसरी) आणि त्यांचे पाच ते सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ईश्वर, शेखर आणि रोहित या तिघांना अटक केली आहे.

शेटिबा नागाप्पा चौगुले (वय 50, रा. बालाजीनगर, टेल्को रोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौगुले यांची जय तुळजा भवानी नाश्टा हाऊस नावाची गणेशनगर येथे टपरी आहे. बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता चौगुले टपरी बंद करत होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या टपरीवर आले. त्यांनी वडापाव मागितला. मात्र, टपरी बंद करत असल्याने वडापाव नसल्याने चौगुले यांनी आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी चौगुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादी चौगुले त्यांचा मुलगा आणि इतर चार ते पाच जणांना घेऊन आरोपींच्या पालकांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून चौगुले आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. पोलिसांनी ईश्वर, शेखर आणि रोहित या तिघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.