मुंबई, दि. २३ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्यावर ३५ कोटींच्या मानहानीचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी दाखल केला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे तसेच तथ्यहीन आरोप केल्याचा दावा अब्दुल रहमान अंजरिया यांनी केला आहे. लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लक्ष्मण माने यांनी अब्दुल रहमान अंजरिया यांच्यावर आरोप केले होते. अंजरिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपामध्ये काम केल्याचे म्हटले होते. अंजरिया यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावरदेखील लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतला होता.
लक्ष्मण माने यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत, असा दावा अंजरिया यांनी केला आहे. तसेच वकिलांच्या मार्फेत ३५ कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण माने यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल माफी मागावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.