लोकांच्या मनात नरेंद्र मोदींची हवा नाही तर तुफान होते – रामदास आठवले

0
421

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – सरकारच्या कामावर २०१९ ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

रामदास आठवले यांनी वांद्रे येथील संविधान बंगल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटप करून एनडीएच्या महाविजयाचे जल्लोषात स्वागत केले. या जल्लोषात रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले, पुत्र सहभागी झाले होते. महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४२ जागा महायुतीने जिंकत असल्याचा निकाल येत असल्याने रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होत आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या अपप्रचाराला देशभरातील दलित बहुजन जनतेने भीक घातली नाही. मोदींच्या आणि एनडीएला देशभरातील आंबेडकरी जनतेने ; दलित बहुजनांनी भरीव मतदान देऊन खंबीर साथ दिल्याबद्दल दलित बहुजन आंबेडकरी जनतेचे रामदास आठवले यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.