Desh

लोकसभा निवडणुकीत स्वबळावर ३०० जागा जिंकूच; भाजपचा दावा

By PCB Author

May 07, 2019

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील सहाव्या आणि सातव्या टप्प्यांतील ११८ जागांसाठीचे मतदान शिल्लक असताना, ‘भाजप स्वबळावर तीनशे जागा जिंकणार’ अशी आवई दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उठली आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नव्हे तर त्सुनामी आली असून २३ मे रोजी पूर्वीपेक्षा जास्त संख्याबळाने सत्तेत परतणाऱ्या भाजपपुढे विरोधी पक्षांची वाताहत होणार आहे, असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करीत आहेत. भाजपमध्ये अकस्मात निर्माण झालेल्या या आत्मविश्वासामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून, ते सावध झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करून केलेला नकारात्मक प्रचार विरोधी पक्षांवर उलटला आहे. पुलवामाच्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानच्या बालाकोटवर केलेला हवाई हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांसह ‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणेचा देशातील मतदारांवर अतिशय सकारात्मक प्रभाव पडला असून, संपूर्ण देशाचा मूडच पंतप्रधान मोदी यांच्यासाठी अतिशय अनुकूल झाला असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.

चौथ्या टप्प्यापर्यंत ३७४ जागांवर मतदान पूर्ण झाल्यानंतर भाजपला संपूर्ण सात टप्प्यांमध्ये किमान शंभर जागांचा फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. सतराव्या लोकसभेत भाजपचे संख्याबळ १८० जागांच्या आसपास असेल आणि मोदींना पंतप्रधान होण्यासाठी रालोआबाहेरच्या अनेक पक्षांची मनधरणी करावी लागेल, असा सूर दिल्लीत उमटत असतानाच भाजपच्या गोटातून अचानक ३०० जागा जिंकण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप सन २०१४पेक्षा जास्त संख्याबळासह केंद्रात सत्तेत परतेल, असा कमालीच्या विश्वासाने दावा करण्यात येत आहे.

सोमवारी संपलेल्या पाचव्या टप्प्याअखेर देशातील ४२५ जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही सतराव्या लोकसभेचे चित्र अस्पष्ट आणि धूसर असताना स्वबळावर तीनशे जागा जिंकण्याच्या चर्चेकडे विरोधी पक्ष संशयाने पाहात आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अवघा राजकीय वर्ग साशंक असताना भाजपने अशाच दाव्यांनिशी निकालापूर्वी वातावरणनिर्मिती केली होती. आताही तशाच पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचे विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा वगळता जवळपास सर्वच राज्यांमध्ये भाजपचे संख्याबळ घटण्याची शक्यता असताना या दाव्यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या मनात ईव्हीएमच्या व्यापक दुरुपयोगाचा संशय बळावू लागला आहे. ईव्हीएमसोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के पावत्या मोजण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.