Chinchwad

लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटलांची मस्ती जिरली – अजित पवार

By PCB Author

July 19, 2019

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मस्ती जिरली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.    

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड  मध्ये आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार कोणीही येऊ द्या, असे आव्हान शिवाजीराव आढळराव पाटील   लोकसभा निवडणुकीत देत होते.  इतकी  मस्ती त्यांना होती.  पण त्यांचा पराभव करून ही मस्ती जिरवली.   बदल हा निसर्गाचा नियम आहे,  बदल हा  होत असतो, असेही अजित पवार  म्हणाले.

आढळरावांचा पराभव राष्ट्रवादीचे  अमोल कोल्हे यांनी केला.  त्याचे उदाहरण देत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना  निराश न होता लढण्याचे आवाहन केले. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे  पिंपरी-चिंचवड महापालिकाच नाही, तर राज्यातही सत्ताबदल होऊ शकतो. आपली सत्ता येऊ शकते, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.  राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे  आपला वाढदिवस जाहिरातबाजी न करता वृक्षारोपण करून साधेपणाने साजरा करा, असे आवाहनही  अजित पवारांनी यावेळी केले.