मुंबई, दि. १७ (पीसीबी) – आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. याबाबत १९ मार्च रोजी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पक्ष प्रमुख राज ठाकरे सविस्तर संबोधन करतील, अशी माहिती पक्षाचे नेते शिरिष सावंत यांनी दिली आहे.
मुंबईत ९ मार्चला झालेल्या मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन, असे सांगून सस्पेन्स कायम ठेवला होता. हा सस्पेन्स आता संपला आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मनसे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ मार्चला मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. आता या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.