लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन घंटानाद करणे अपेक्षित नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
553

 

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज देशरात जनतेने थाळ्या, घंटा, शंख वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. करोनाविरोधात लढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केले होते. पण अनेक ठिकाणी लोक गर्दी करत रस्त्यावर उतरलेले चित्र पहायला मिळाले.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन घंटानाद करणे अपेक्षित नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणे टाळण्याची गरज आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

करोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणे टाळावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.