लॉकडाऊन-५ जवळपास निश्चित, १५ जुन पर्यंत बंदचा निर्णय आज

0
495

नवी दिल्ली,दि.३० : चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपायला आता दोन दिवस बाकी आहेत. या दरम्यान, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्या संदर्भात सल्ले घेतले. त्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या व्यतिरिक्त कॅबिनेट सचिव राजीव गाबा आणि गृहसचिव एके भल्ला हे देखील उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा चढता आलेख पाहता काही क्षेत्रात सुट मिळेल, पण बंद कायम ठेवण्यावर खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठाम आहेत, असे समजते.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत लॉकडाऊनच्या 4 च्या परिणामांविषयी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत झाल्याचे केंद्रालाही माहिती आहे.

देशातील परिस्थिती पाहता पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची शक्यता वाढली आहे. या लॉकडाऊनमध्ये मागच्यावेळीपेक्षा जास्त शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. परिणामी राज्य अंतर्गत व्यवहार वाढू शकतात. सोबतच राज्यांना त्यांच्या स्तरावर नियम व अटी तयार करण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो. विशेषकरुन ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्याला राज्य सरकारसोबत मिळून रणनिती आखण्याची सूट मिळू शकते.

लॉकडाऊन संपण्याआधी पंतप्रधान आणि सर्व राज्यातील मुख्यमंत्री यांच्या होणाऱ्या बैठकची आशा आता मावळली आहे. कदातिच त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता लॉकडाऊन वाढवायचा की नाही हा निर्णय केंद्राला घ्यायचा आहे.