Desh

लग्नानंतर २५ दिवसात पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

By PCB Author

May 18, 2019

बंगळुरू, दि. १८ (पीसीबी) – लग्नानंतर अवघ्या २५ दिवसात एका २४ वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आर.शंकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आर.शंकरला पत्नी त्रास देत होती. पत्नीकडून होणारा त्रास असह्य झाल्याने शंकर याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. शंकरची पत्नी घर सोडून तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली होती. लग्नानंतर तिने शंकरकडे स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरला होता. बंगळुरु मिररने हे वृत्त दिले आहे.

शंकर आणि लक्षिथाचा प्रेमविवाह होता. दोघे हालासुरु येथे रहायचे. लक्षिथा तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली होती. तिने शंकरचे फोन कॉल्स आणि मेसेजला रिप्लाय देणे बंद केले होते. रविवारी शंकरने लक्षिथाला एक मेसेज पाठवला. तू तुझी वर्तणूक बदलली नाहीस आणि घरी परतली नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन अशी त्याने धमकी दिली होती. विषाच्या बाटलीचा फोटो देखील त्याने पाठवला होता.

त्यावर लक्षिथाने काहीही हरकत नाही असा संदेश पाठवला. या उत्तरामुळे दुखावल्या गेलेल्या शंकरने विष प्राशन करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. शंकरच्या आत्महत्येनंतर दुसऱ्यादिवशी त्याचे वडिल राजू राजन यांनी लक्षिथा आणि अन्य काही जणांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बीबीएमध्ये पदवीधर असणारा शंकर नुकताच एक बीपीओ कंपनीत नोकरीला लागला होता. शंकर आणि लक्षिथा मागच्या वर्षभरापासून परस्पराच्या प्रेमात होते. यावर्षी १८ एप्रिललाच दोघे विवाहबंधनात अडकले होते. विष प्राशन केल्यानंतर शंकरने त्याच्या मित्रांना फोन करुन सांगितले. त्याचे मित्र त्याला बोरींग रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत त्याने प्राण सोडले