लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा मृत्यू, १०० वऱ्हाडींना कोरोना

0
523

पटणा, दि. १ (पीसीबी) : बिहारची राजधानी पटणामध्ये कोरोना संसर्गाची धक्कादायक घटना समोर आली आहे. पटणात एका लग्नात हजर असलेल्या 100 हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या लग्नातील नवरदेवाचा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला .यामुळे पटणातील आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. देशभरात या लग्नाची चर्चा सुरु आहे.

संबंधित नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तो गुरुग्राम येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो लग्नासाठी पटणा येथे आला होता. विशेष म्हणजे नवरदेवाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही घटना पटणा जिल्ह्यातील पालीगंज गावात घडली. ही घटना समोर येताच या लग्नातील आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या कोरोना चाचणी घेतल्या जात आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याचं बिहारमधील हे पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. नवरदेवाची कोरोना चाचणी न होण्याविषयी प्रशासनाने म्हटलं आहे, “नवरदेवाच्या मृत्यूची माहिती मिळून त्याची चाचणी घेण्याआधीच मृताच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अंतिमसंस्कार केले.”
नेमका घटनाक्रम काय?
संबंधित लग्न सोहळा 15 जून रोजी झाला होता. लग्नानंतर दोनच दिवसात नवरदेवाचा मृत्यू झाला. नवरदेवाला कोरोनाचे लक्षण असल्याचाही आरोप होत आहेत. मात्र, त्याच्या कुटुंबियांकडून हे आरोप फेटाळले आहेत. तसेच तो बाहेरुन आल्यावर 14 दिवस क्वारंटाईन राहिल्याचंही म्हटलं आहे. नवरदेव सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो गुरगाव येथून गावाकडे आला होता. लग्नानंतर त्याची तब्येत बिघडली. त्याला पोट दुखण्याचा त्रास असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. यानंतर त्याला पटनातील एम्स रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
जिल्हा प्रशासनाला नवरदेवाच्या मृत्यूची माहिती मिळताच लग्नात सहभागी झालेल्या सर्वांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या. आतापर्यंत यात 100 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 9 हजार 640 रुग्ण आढळले आहेत. यापैकी सध्या 2,188 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत 7,390 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या 62 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.