लक्षात ठेवा, क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही – धनंजय मुंडे

0
351

महाराष्ट्र,दि.१०(पीसीबी) – हिंगणघाट जळतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे. क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असं ट्विट करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला दम दिला आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरूणीच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही स्त्रियांवर अत्याचार आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना दम दिला आहे.

दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेनं सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे.