रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीच्या दूधाची वाट पाहताय का? – धनंजय मुंडे

0
372

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार) विधान परिषदेत उपस्थित केला.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभरात सुरू केलेल्या दूधबंद आंदोलनाचा    मुद्दा मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला. मार्च महिन्यात मुंबईच्या विधानभवनावर शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आला आणि आता शेतकऱ्यांना रस्त्यावर दुध ओतावे लागत आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच नाही, असे धोरण सरकारने  ठरवले आहे का? असा सवाल मुंडे यांनी केला.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात. या विधानाचा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला. नागपुरच्या सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना समजत नाहीत. दुधातील पाणी कसे दिसते?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. आंदोलन केल्यानंतरही सरकार केवळ मलमपट्टी करत आहे. केवळ घोषणांमुळे दुध उत्पादकांचे पोट भरणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे त्यांनी सांगितले.